संत ज्ञानेश्वर यांचा जीवनपट
Posted August 12th, 2008 by admin
ज्ञानदेव महाराजांचें महाराष्ट्र्संतमंडळात अनेक बाजूंनी अत्यंत महत्व आहे. तत्त्वज्ञानी, प्रेमळ ईश्वरभक्त, सामाजिक नेते, अलौकिक योगी, ब्रह्मचारी, धर्मसंरक्षक आणि प्रासादिक ग्रंथकार, अशा अनेक नात्यांनी त्यांची निर्मळ किर्ती आज अखंडपणे दिव्य घोषाने महाराष्ट्रात आणि जगात दुमदुमत राहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे कर्ते आणि वैष्णवसंप्रदायाचे प्रवर्तक या नात्याने मननशील ज्ञानीजनांच्या, तसेच भोळ्या भाविक वारकऱ्यांच्याही जिव्हाळ्याशी ते एकजीव झाले आहेत.
ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे गोदातीरावरील पैठणजवळील आपेगावच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांचे चिरंजीव. अल्पवयातच वेदाध्ययन व शास्त्राध्ययन करून विठ्ठलपंत मोठे ज्ञानसंपन्न व वैराग्यशील ईश्वरभक्त झाले. संसारात त्यांचे मन रमेना. तीर्थक्षेत्रींच्या यात्रा कराव्या, भक्तमंडळींच्या सहवासात रमावे, आणि ईश्वरसेवेत आयुष्य सार्थकी लावावे, अशी सारखी त्यांच्या मनाला ओढ लागली होती. यामुळे कुमारावस्थेतच ते तीर्थाटनाकरिता घराबाहेर पडले, आणि निरनिराळ्या क्षेत्रांचे दर्शन घेत घेत पुण्याजवळच्या आळंदी या गावी आले. आळंदीस सिधोपंत कुलकर्णी नावाचे एक सुखवस्तु व भाविक सज्जन राहात होते. सिद्धेश्वराच्या मंदिरात उतरलेल्या या तरुण पांथस्थ ब्राह्मणाची ती ज्ञानसंपन्न मुद्रा , निर्मळ वॄत्ती आणि कर्मनिष्ट आचरण पाहून सिधोपंतांनी आपल्या उपवर कन्येचे त्याच्याशी लग्न लावून देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे विठ्ठलपंताजवळ आपला विचार बोलून दाखवला. वैराग्यशील विठ्ठलपंतानी या गोष्टीस आपली सहमती दर्शवली नाही; पण लवकरच त्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याबद्दल स्वप्नदॄष्टांत झाला, आणि हाच ईश्वरी संकेत असावा असे समजून विठ्ठलपंतानी सिधोपंतांच्या मुलीशी, रुक्मिणीशी विधिवत विवाह करून संसार थाटला.